भारतीय जनता पार्टीकडून वंचित आणि उपेक्षित घटकांच्या सशक्तीकरणासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून, तृतियपंथी समाजाच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करत, लवकरच भाजपा तृतियपंथी आघाडीची स्थापना करणार असल्याची घोषणा भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
बुधवारी, भाजपा प्रदेश कार्यालयात पार पडलेल्या एका विशेष कार्यक्रमात, राज्यभरातील अनेक तृतियपंथियांनी भाजपामध्ये प्रवेश केला. या कार्यक्रमाला प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, प्रदेश मुख्यालय प्रभारी रवींद्र अनासपुरे, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आणि प्रदेश प्रवक्ता ओमप्रकाश चौहान यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना श्री. बावनकुळे म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र संकल्पना पूर्ण करण्यासाठी तृतियपंथी समाज भाजपामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहे. त्यांचे हक्क आणि अधिकार संरक्षित राहतील, यासाठी भाजपा कटिबद्ध आहे. तसेच, केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा लाभ तृतीयपंथीय समाजापर्यंत पोहोचवण्यासाठीही पक्ष प्रयत्नशील आहे.”
या नव्या आघाडीच्या माध्यमातून जिल्हा पातळीवर तृतियपंथीयांना प्रतिनिधित्व दिले जाणार आहे. यामध्ये एका प्रमुख पदाधिकाऱ्यासह संयोजक आणि 5 ते 6 सह-संयोजकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. तृतियपंथीय समाजातील कार्यकर्त्यांनी भाजपाचे सक्रिय सदस्य बनावे आणि राज्यभरातील सुमारे 5 लाख तृतियपंथीयांनी पक्षात सहभागी व्हावे, असे आवाहनही श्री. बावनकुळे यांनी केले.
या वेळी तृतियपंथी समाजाच्या प्रतिनिधी डॉ. सान्वी जेठवाणी यांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितले की, “या दुर्लक्षित समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी भाजपा सक्षम आहे, म्हणून आम्ही या पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.”
या कार्यक्रमात कोल्हापूरच्या मयुरी आळवेकर, नागपूरच्या राणी ढवळे आणि बेबी नायक, धुळ्याच्या पार्वती जोगी, पुण्याच्या कादंबरी, मुंबईच्या शोभा नायक, तसेच अनेक ठिकाणच्या तृतियपंथीयांनी भाजपामध्ये प्रवेश केला.
स्वातंत्र्य न्यूज,मुंबई _ न्यायासाठी लढणारी स्वातंत्र्याची बातमी