उत्तन येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे ‘स्पेस टेक फॉर गुड गव्हर्नन्स’ परिषद

ठाणे, दि. ६ (जिमाका): येणारा काळ हा स्पेस टेक चा असून ‘एआय’ आणि स्पेस टेक चा संयुक्त वापर करून राज्याला अधिक प्रगत बनविण्याचा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आणि स्पेस टेक यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्पेस-टेक फॉर गुड गव्हर्नन्स’ या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
स्पेस टेकचा वाढता प्रभाव
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, विविध उद्योग आणि सरकारी कामकाजांमध्ये स्पेस टेकचा प्रभाव वाढला आहे. याचा उपयोग रिमोट सोर्सिंग, ड्रोन जीपीएस आणि पारदर्शक प्रशासनासाठी केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेने स्पेस टेक धोरण तयार करण्यात आले असून, खासगी क्षेत्रालाही यात संधी दिली जात आहे.

स्पेस टेकमुळे मोठी बचत
स्पेस टेकचा प्रभावी वापर केल्यामुळे मॅन्युअल प्रोसेस बंद करून डिजिटल प्रणाली लागू केली जाणार आहे, ज्यामुळे अडीच हजार कोटी रुपयांची बचत होईल. याच तंत्रज्ञानाच्या मदतीने ‘जलयुक्त शिवार’ योजनेअंतर्गत २० हजार गावांमध्ये जल व्यवस्थापन करण्यात आले आहे. तसेच, दरड कोसळणे, पूर, भूस्खलन, भूकंप यांसारख्या आपत्तींवर नियंत्रण मिळवण्यासाठी स्पेस टेक मदत करू शकते.
स्पेस टेकच्या माध्यमातून उत्तम शासन
ग्रामपंचायत विकास आराखड्यासाठी (GPDP) जिओस्पॅशल तंत्रज्ञान अत्यंत प्रभावी ठरू शकते. उपग्रह प्रतिमा आणि भू-स्थानिक साधनांचा उपयोग करून ग्रामीण भारतातील समस्या सोडवता येऊ शकतात. यामुळे सरकार, उद्योग आणि तंत्रज्ञान संस्थांमध्ये समन्वय वाढेल तसेच, सार्वजनिक सेवांमध्ये सुधारणा होईल.

तीन महिन्यांत नवीन स्पेस टेक धोरण
राज्य सरकार आगामी तीन महिन्यांत स्पेस टेक धोरण तयार करणार असून, यासाठी स्टार्टअप आणि तंत्रज्ञानाच्या इकोसिस्टमला चालना देण्यात येणार आहे.
परिषदेत मान्यवरांची उपस्थिती
या परिषदेत लेफ्टनंट जनरल विनोद खंडारे (निवृत्त), डॉ. प्रकाश चव्हाण, माजी राज्यसभा सदस्य डॉ. विनय सहस्त्रबुद्धे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गीता कुलकर्णी यांनी केले तर, डॉ. जयंत कुलकर्णी यांनी प्रस्तावना मांडली.
स्पेस टेकच्या मदतीने महाराष्ट्र राज्य अधिक विकसित करण्याचा राज्य सरकारचा मानस असून, या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने भविष्यातील विविध प्रकल्प जलद गतीने पूर्ण होतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
#swatantryanews#marathinews#maharashtra#