बांगलादेशात हिंदूंवर होणारे अत्याचार थांबवण्यासाठी भारत सरकारने तातडीने कडक पावले उचलावीत, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) तर्फे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, बांगलादेशात अल्पसंख्य हिंदूंवर अत्याचार व हिंसेच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. शेख हसीना यांच्या सत्तेतून हकालपट्टीनंतर परिस्थिती अधिकच बिकट झाली असून नुकत्याच इस्कॉन नमहट्टा मंदिरावर हल्ला करून देवतांच्या मूर्तींची विटंबना करण्यात आली. तसेच, हिंदू भिक्षू चिन्मय कृष्णदास यांना राजद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.
शिवसेनेने या घटना तीव्र शब्दांत निषेध करत भारत सरकारने त्वरित हस्तक्षेप करून बांगलादेश सरकारवर दबाव आणावा, अशी मागणी केली आहे. निवेदनात 1971 मध्ये बांगलादेशाच्या मुक्तिसंग्रामासाठी भारताने दिलेल्या योगदानाची आठवण करून दिली आहे. भारताच्या पाठिंब्यामुळे मिळालेल्या स्वातंत्र्यानंतरही आज तिथल्या हिंदूंना छळ सहन करावा लागत आहे, ही शोकांतिका असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
शिवसेना ठाकरे गटाने बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षिततेसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरही पावले उचलण्याचे आवाहन केले. परिस्थिती सुधारली नाही, तर नाशिकमध्ये तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला.
शिवसेनेच्या शिष्टमंडळातील दत्ताजी गायकवाड, विनायक पांडे, वसंत गिते, विलास शिंदे, डी.जी. सूर्यवंशी यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.
स्वातंत्र्य न्यूज – “न्यायासाठी लढणारी स्वातंत्र्याची बातमी”
बांगलादेश #हिंदूअत्याचार #शिवसेना #ठाकरेगट #स्वतंत्रतान्यूज #हिंसाविरोध #भारत #इस्कॉन #बांगलादेशअत्याचार #हिंदूसुरक्षा #आंतरराष्ट्रीयआंदोलन #निवेदन.